Tuesday, January 22, 2008

मी पाहिलेली कारसेवा!!!


॥ श्री ॥

जय भवानी ॥ जय शिवाजी ॥

आजपासुन १ वर्षापुर्वी सकाळच्या माध्यमातुन श्री. राजू शेळके व बाजारवाडी ग्रामस्थांनी एक जाहीर आवाहन केले होते. दिनांक २१ जानेवारी २००७ रोजी रोहिडागडावरील रोहिडमल्ल मंदिराच्या जिर्णोधारासाठी कारसेवा बोलवण्यात आली होती. त्यांच्या विनंतीला मान देऊन सुमारे ५०० ते ६०० लोक जमा झाले होते. एकूणच सर्व लोकांमध्ये उत्साह दिसून आला.
आवाहनामध्ये मंदिर जीर्णोधारसाठी म्हणून "कारसेवा" हा शब्द वापरला गेला, पण आपल्या मनातील कारसेवेचा अर्थ आणि ह्या दिवशी आयोजीत कारसेवेत फार फरक होता. काळानुरुप जीर्ण झालेले रोहिडमल्लाचे मंदिर पुन्हा बांधून उभे करण्यासाठी बाजारवाडी ग्रामस्थांनी कारसेवा आयोजली होती. ह्यामध्ये बाजारवाडी ग्रामस्थ, भोर व जवळील शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच पुणे, मुंबई आणि महाराष्ट्रातील शिवप्रेमी, गडप्रेमी लोकांनी उपस्थिती दर्शविली.

ह्या कारसेवेसाठी आदल्या दिवसापासूनच बाजारवाडीमध्ये लोक दाखल झाले होते. त्यांची जेवणाची आणि राहण्याची सोय ग्रामस्थांनी अगदीच चांगल्या प्रमाणे केली होती. कारसेवेच्या दिवशी २१ जानेवारी २००७ रोजी सकाळी दूध-पोहे नाष्टा केल्यावर छोट्या स्वरुपाचा स्वागत समांरभ झाला, त्यात मान्यवरांनी भाषणे केली. त्यात एका मुलीने भाषण केले ते फारच स्फुर्ती दायक झाले. आमच्या युग-परिवर्तक संस्थेने श्री. राजू शेळके यांना एक संजीवनी माची (किल्ले राजगड) चे चित्र भेट केले. एकुण हा कार्यक्रम लांबल्याने काही लोकांनी कामासाठी निघून जाण्याची सुचना केल्यावर हा कार्यक्रम जरा लवकर आटोपण्यात आला. कार्यक्रम संपला असे घोषीत केल्यानंतर सर्व कारसेवक गडाच्या पायथ्याकडे गेले.

आमच्या (मी सक्रिय कार्यकर्ता होतो) नियोजनानुसार २० कारसेवक पायथ्याला वाळूची पोती भरायला व लगेचच असलेल्या छोट्या चढणीवर हे सामान चढविण्याकरिता ४० लोक पाहीजे होते, पण झालेला उशीर बघता जो तो वाळूने भरलेली पोती उचलून वरती जाऊ लागला. आम्ही काही स्वयंसेवकानी वेळप्रसंग जाणून योग्य ती सुचना करुन कामामध्ये सूसुत्रता आणण्याचा प्रयत्न केला. काही प्रमाणात त्यांना यश आले सुद्धा.

मंदिरासाठी जमा झालेले साहित्य म्हणजे ३५०० विटा, ५० पोती सिमेंट, व १ ट्रक वाळू, ह्यातील काही प्रमाणात सामान गाढवांच्या मदतीने शक्य तितक्या उंची पर्यंत पोहचविण्यात आले होते. ह्यातील उरलेले साहित्य व अर्धवट वरती पोहचलेले साहित्य मानवी साखळीद्वारे वरती पोहचविण्यात आले. एकूणच ह्या श्रमदानामध्ये लहान मुलाचा सहभाग जाणवत होता. काही ठिकाणी २-२ ची छोटी टीम करुन एक वाळूचे पोते (१०-१५ किलो.) गडावर न्हेत होते. तर काही मुले दोन्ही खांद्यावर दोन-दोन विटा उचलून न्हेत होते. काही मुली पाणी कारसेवकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करीत होते. मी एका मुलीला विचारले असता ती म्हणाली मी ३ वेळा गडावरुन पाणी खालपर्यंत आणून देत आहे. त्या वेळेला मला ह्या छोट्या मुलांचे "डेडिकेशन" जाणवले. सर्व जण खूप स्फुर्तीने काम करत होते. हे सामन गडावर पोहचले सुद्धा. पण इच्छित स्थळी हे सामान चढू शकले नाही ह्याचा आम्हास खेद वाटतो.

सकाळने केलेल्या मदती बद्दल सकाळ वृत्तपत्राचे आभार. आदल्या दिवसांपासुनच्या ते दुसरया दिवसाच्या जेवणा पर्यंतची योग्य ती सोय केलेल्या बाजारवाडी ग्रामस्थांची व श्री. राजू शेळके ह्यांचेही आभार मानतो. तसेच तिथे जमलेल्या सर्व शिवप्रेमिंचे व इच्छित असुनही न येऊ शकलेल्या लोकांचे मी आभार मानतो. भविष्यकाळात अश्या कार्यक्रमास सहभागी होतील ह्याची आम्ही आशा धरतो.

मी काल म्हणजे २१ जानेवारी २००८ रोजी ह्या सर्व आठवणी उजळवुन काढण्यासाठी रोहिडा गडावर गेलो होतो. आता मंदिराची बरयाच प्रमाणात उभारणी झाली असुन फक्त छत उभारणीचे काम बाकी आहे. ह्या सोबत मी आत्ताचे तसेच १ वर्षापुर्वीचे छायाचित्र जोडत आहे. ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी हे अनुभव आपापल्या मित्र मैत्रिणिना पाठवावे. ज्याजोगे सध्याचे कामाचे स्वरुप लोकांपर्यंत पोहचेल.